नाशिक : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ९) अन्य पक्षांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देवळाली विधानसभा मतदारसंघासाठी देखील काही प्रवेश झाले.
त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यासंदर्भात कुठलेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
भाजपमध्ये सध्या जे प्रवेश होत आहे ते इतर पक्षांकडे नेतृत्व नसल्याने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास गॅरंटीच्या आधारे होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
21भारतीय जनता पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात आज शेकडो प्रवेश झाले. त्यात तहसीलदार पदाचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेल्या राजश्री अहिरराव, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी संबंधित सोनाली राजे पवार व काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांच्या प्रवेशाचा समावेश आहे.
अहिरराव यांचा प्रवेश झाल्याने त्या देवळालीसाठी इच्छुक आहे, तर यापूर्वीच माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुश्री घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या राज्यात भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या शिंदे गटाची युती आहे.
या युतीला महायुती असे नाव देण्यात आले आहे. श्रीमती अहिरराव यांना प्रवेश दिल्याने देवळालीची जागा भाजप लढवणार का, या प्रश्नाला उत्तर देताना महाजन यांनी नकारात्मक उत्तर दिले.
देवळाली विधानसभेमुळ अन्य विधानसभा मतदारसंघासाठी कुठलीही कमिटमेंट देण्यात आलेली नाही. मुळात जे प्रवेश करत आहे ते उमेदवारीसाठी प्रवेश करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास असल्याने त्यातून हे प्रवेश होत आहे.
या माध्यमातून भाजपदेखील मोठा होत आहे. अहिरराव यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर कुठलेही दडपण आणण्याचे काहीच कारण नाही. महायुतीमध्ये एकजूट असून, जागा वाटपात जो काय निर्णय व्हायचा तो होईल, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.