बीड :- मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत 24 डिसेंबर रोजी संपत आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांची बीड मध्ये इशारा सभा झाली. या सभेत मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे म्हणाले, आंदोलन करायचं पण शांततेत.पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे व्हायचं नाही. आम्हाला हौस नाहीये, आम्ही मराठा समाज मूर्ख नाहीये. पण आम्ही किती सहण करायचं. तुम्ही माझ्याकडून 3 महिन्यांचा वेळ घेतला मग 40 दिवसांचा वेळ घेतला. आता पुन्हा 24 डिसेंबरपर्यंत वेळ घेतला. आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत, भावना आहेत. आमच्या लेकराला किती त्रास तयारीला लागा तुम्ही 15 जानेवारी म्हणताय पण नको. कारण, मुंबईत 18 जानेवारीपर्यंत 144 कलम लागू आहे. मुंबईतल्या आझाद मैदानात 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार मनोज जरांगे पुढे म्हणाले, 20 जानेवारीची तयारी करा पण शांततेने जाहीरपणे सांगतो, मराठे जर मुंबईकडे निघाले तर हा विराट समुदाय माघारी नाही फिरणार. आरक्षण घेऊनच माघारी फिरणार कोण आडवं येतं त्यांनी या आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही.
पुढचं होणारं आंदोलन तुम्हाला 100 टक्के जड जाणार
मनोज जरांगे यांनी म्हटलं, देशातील जेवढे राज्य आहेत त्या राज्यातील मोठी जात संपवण्याचा घाट तुम्ही घातलाय असं दिसायला लागलं आहे. पण शेवटी एकदा जर मोठा समुदाय खवळला तर शांततेत का होईना तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा. तुमचं राजकीय अस्थित्वाचा सुपडा साफ होईल. माझ्या मराठ्यांना तळपवू नका. तुम्ही एकदा प्रयोग केलाय.. आता सावध व्हा… तुम्ही सामंजस्याने, ठरल्याप्रमाणे मराठ्यांना आरक्षण द्या त्याचं ऐकून तुम्ही जर मराठ्यांवर अन्याय केला तर आता पुढचं होणारं आंदोलन तुम्हाला 100 टक्के जड जाणार.