पुणे :- ‘छगन भुजबळ यांच्याविषयी नाराजी नाही. त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी माझाच पुढाकार होता. मी कोर्टाबद्दल आरडाओरडा केला नसता तर ते बाहेर आले नसते. भुजबळ यांनी आम्हाला सोबत यावे, असे म्हटले आहे. मात्र, आम्हाला त्याची गरज नाही,’’ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे मंगळवारी केला.
महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ॲड. आंबेडकर यांनी समता भूमी येथे त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘भुजबळांबद्दल माझी नाराजी नाही. उलट त्यांना तुरुंगातून बाहेर काढणारा मीच आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भुजबळांना तुरुंगातून सोडून देण्याबाबतच्या निर्णयास दिरंगाई होत होती. त्यावेळी संबंधित न्यायाधीशांबद्दल मी आरडाओरडा केला. त्यमुळे भुजबळ तुरुंगातून बाहेर आले.
माझी भुजबळांवर नाराजी असती तर मी सार्वजनिकरित्या त्या न्यायाधीशाला शिव्या घातल्या नसत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही भुजबळांबद्दलचा निर्णय घेतला नाही तर संबंधित न्यायाधीशावर खटला चालवता येऊ शकतो, हे लक्षात घ्यावे असे जाहीररित्या बजावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भुजबळांना सोडून देण्यात आलं. परंतु, भजबळ यांनी त्याची कधीच जाणीव ठेवली नाही, असेही डॉ. आंबेडकर म्हणाले. ओबीसी आरक्षणाचा जनक मी आहे. ६ डिसेंबर नंतर हिंदू- मुस्लिम किंवा ओबीसी विरुद्ध मराठा अशा दंगली होऊ शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.